एसआयपी “गौरब”

 

“जुन्या काय आणि नव्या काय घड्याळांच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात. सुखाने टळलेली दुपार पाहायला तबकडी आणि पट्टा कसला का असेना घड्याळाचं काय आणि माणसाचं काय आतलं तोल सांभाळणारे चक्र निट राहीलं की फार पुढे ही जायची भिती नाही आणि मागे ही पडायची चिंता नाही भिती नाही” अस पूलंनीच असा मी असामी मध्ये लिहून ठेवले आहे. पूलंनी घडयाळ्याच्या बाबतीत जे म्हटलंय ना ते म्युच्युअल फंडाच्या बाबतीत सुद्धा खरे आहे. वेगळा फंड म्हणजे वेगळी नांवे आणि थोडा फार गुंतवणुकीतला फरक. या गुंतवणुकीतील फरकामुळे कमी अधिक दिसणारा गुंतवणुकीवरील नफा. नफा कमी अधिक झाल्यामुळे आपण आपली एसआयपी बंद करायची नसते हे गौरब पारीजांकडून शिकणे गरजेचे आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे सेल्स अँड मार्केटिंग हेड असलेल्या गौरब पारिजा यांची. त्यांनी पहिली ५०० रुपयांची एसआयपी टेम्पलटन इंडिया ग्रोथ फंडात सुरु केली. म्युच्युअल फंडाच्या परिभाषेत हा फ़ोलिओ अजून लाइव आहे.

आयआयएम बंगळरु या संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या गौरब १९९५ मध्ये तत्कालीन युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अर्थात युटीआयमध्ये रिसर्च अँड प्लानिंग विभागात दाखल झाले. बाजाराची कामगिरी समाधानकारक नसल्याने युटीआय ‘युएस ६४’चा १९९६ साठीचा लाभांश जाहीर करू शकली नव्हती. त्या बदल्यात १०:१ या गुणोत्तरात बोनस युनिट्स दिली होती. क्रोधीत झालेल्या गुंतवणूकदारांना शांत करण्यासाठी युटीआयने देशभरात गुंतवणूकदारांच्या मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्या वेळी नव्याने दाखल झालेल्या २० विश्लेषकांवर या मेळाव्यात गुंतवणूकदारांना संबोधित करण्यासाठी जबाबदारी दिली होती. या टीमचे गौरब पारिजा हे एक सदस्य होते. त्यांनी पूर्व भारतात झालेल्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात ही जबाबदारी  यशस्वी पार पाडल्यामुळे युटीआयने त्यांना गुंतवणूक विभागातून कोलकोत्यात मार्केटिंग विभागात पाठविले. मुंबईपेक्षा कोलकोत्याहून भुवनेश्वरला कमी वेळात जाता येते म्हणून गौरब यांनीसुद्धा ही बदली आनंदाने स्वीकारली. ते मार्केटिंग विभागात गेल्यामुळे म्युच्युअल फंड उद्योग एका चांगल्या निधी व्यवस्थापकाला मुकला. याच दरम्यान मुंबईत असतांना त्यांनी १९९६ मध्ये पहिली ५०० रुपयांची एसआयपी टेम्पलटन इंडिया ग्रोथ फंडात सुरु केली. त्यावेळी एसआयपीची सुविधा केवळ टेम्पल्टनमध्येच उपलब्ध होती.

“बारा चेक देने पडते थे बँक ऑफिसरको मस्का लगाना पडता था एक चेक बुक लेने के लिये” गौरब नेहमीच ही गोष्ट सांगतात.

युटीआयच्या कोलकोता येथे क्षेत्रीय कार्यालयात काम करीत असतांना त्यांच्या कडे पूर्व भारतातील ८३ जिल्ह्यांची जबाबदारी होती. ही जबाबदारी त्यानी १९९६ ते १९९९ दरम्यान पार पडली. त्याच दरम्यान युटीआयने निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांची विक्री सुरु केली. युटीआय बॉंड फंडाच्या पूर्व भारतातील मार्केटिंग कॅम्पेनची जबाबदारी त्यांनी उत्तम पार पाडली. या  कामगिरीची नोंद फ्रॅकलीन टेम्पलटन या स्पर्धकला घ्यावी लागली आणि सहा महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यावर झालेल्या १० मुलाखतींनंतर ते फ्रॅकलीन टेम्पलटनच्या पूर्व भारताचे व्यवसाय प्रमुख म्हणून दाखल झाले. युटीआय सारख्या ९० हजार कोटी मालमत्ता असलेल्या कंपनीतून ९०० कोटी मालमत्ता असलेल्या कंपनीत दाखल होण्याचा निर्णय त्यांनी लग्नाला एक वर्ष होण्या आधी घेतला हे विशेष.

फ्रॅकलीन टेम्पलटनच्या कोलकोता येथील रिजनल ऑफिसमध्ये केवळ दोन कर्मचारी होते. पहिले गौरब आणि दुसऱ्या त्यांच्या सहकारी ज्या अस्थायी कर्मचारी होत्या. चार वर्षाच्या यशस्वी कारकिर्दी नंतर त्यांची बदली नवी दिल्लीत फ्रॅकलीन टेम्पलटनच्या उत्तर भारताचे व्यवसाय प्रमुख म्हणून झाली. या कार्य काळात त्यांनी पोस्ट खात्यसोबत म्युच्युअल फंड विकण्यासाठी करार केला. पोस्टाने आपली ताकद ओळखली नाही असे ते नेहमी म्हणतात. त्यांच्या एका फंड विक्रीच्या वेळी २ लाख अर्ज आले या पैकी ११ हजार अर्ज फक्त पोस्ट खात्याकडून आलेले होते. पोस्टाने म्युच्युअल फंड विकले तर आज पोस्ट खाते म्युच्युअल फंडाचे सर्वात वितरक असते, असे त्यांचे मत आहे. त्यांनी फ्रॅकलीन टेम्पलटनच्या मध्ये त्यांनी १६ वर्षात वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विस्ताराच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

मार्च २०१७ पासून ते आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे सेल्स अँड मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. पहिली एसआयपी करून वीस वर्षांहून अधिक काळ लोटला असल्याने त्यांची सर्व वित्तीय ध्येये पूर्ण झाली आहेत. आर्थिक बाजू भक्कम असल्याने त्यांची सेवा निवृत्ती कधीही घेण्याची तयारी आहे. लोकांना सेवानिवृत्ती बद्दल सल्ला देणारे हे स्वत: पन्नाशीत नोकरी सोडण्यास ते सक्षम आहेत याची  विशेष नोंद घ्यायला हवी. यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून सेकंड होम घेतलेले नाही. ते सर्व बचत इक्विटी फंडात ठेवतात. जेव्हा कधी भेट होते तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

आमच्या मागील भेटीत सहजच त्यांना प्रश्न विचारला रिटायरमेंटके बाद क्या प्लान है?”

“भुवनेश्वर जाउंगा और म्युच्युअल फंड बेचुंगा अब मेरी कंपनीके जो काम करता हुं वो काम खुदके लिये करुंगा जिंदगीभर एकही काम मैने किया है लोगोंको एसआयपी की सही बात समजायी है मैने”.  समाजातल्या शेवटच्या स्तरात एसआयपी नेणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे.  इंस्टंटच्या काळात गुंतवणूकदारांना नफा सुद्धा इंस्टंट हवा असतो. गौरब परीजां यांनी वीस वर्षांपूर्वी सुरु केलेली एसआयपी लाईव्ह ठेवली आहे वेळोवेळी त्यात भर घातली. वीस वर्षांपूर्वी सुरु केलेली एसआयपी अजूनही बंद केलेली नाही म्हणूनच त्यांच्या पोर्ट फोलीओत सर्वात कमी नफ्याची वार्षिक टक्केवारी १९ टक्के आहे. हल्ली एखाद्या फंडतील नफ्याची टक्केवारी जरा कमी झाली की लगेचच गुंतवणूक सल्लागाराबाबत शाशांक असणाऱ्या गुंतवणूकदर मोठ्या संख्यने सापडतील. फंडाच्या मानदंडापेक्षा फंडाची कामगिरी सरस असली की झाले. सातत्य हा गुंतवणुकीतील यशाचा मूलमंत्र आहे हेच गौरब परीजा यांच्या पोर्टफ़ोलिओ कडून शिकण्यासारखे आहे.

 

अधिक माहितीसाठी खालील Form भरा:

[contact-form-7 id=”22″ title=”Contact Me”]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Scroll to Top