आज नवरात्रीतील ललिता पंचमीचा दिवस. या महत्वाच्या दिवसाच्या निमित्ताने संपत्ती निर्मितीची दशक पूर्ण केलेल्या मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाची ही शिफारस. या फंडाने सुरवातीपासून म्हणजे फेब्रुवारी २०१४ पासून २५.४५ टक्के तर मागील दहा वर्षात २१.७८ टक्के परतावा दिला आहे. याचा अर्थ सुरवातीला (फेब्रुवारी २०१४) पासून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदरांचे पैसे दर २.८८ वर्षात तर मागील दहा वर्षांपासून (ऑक्टोबर २०१४ पासून) गुंतवणूक करणाऱ्याचे पैसे ३.६ वर्षात दुप्पट झाले आहेत. सर्वाधिक वेगाने संपत्ती निर्माण करणाऱ्या पहिल्या पाच फंडात या फंडाची गणना होते. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाच्या एनएफओमध्ये १ लाखाच्या गुंतवणूकीचे आजचे बाजार मुल्य १० लाखांहून अधिक झाले आहे. मिडकॅप फंडांना ६५ टक्के मालमत्ता बाजार भांडवलानुसार (मार्केटकॅप) १०१ ते २५० क्रमांकात असलेल्या कंपन्यांत गुंतवावे लागतात. अनेक उद्योग व्यवसायात गुंतवणुकीच्या संधी केवळ मिडकॅप मध्येच उपलब्ध आहेत. ही उद्योग क्षेत्रे लार्ज कॅप कंपन्यांत उपलब्ध नाहीत उदा. कृषी, स्थावर मालमत्ता विकास वाहन पूरक उत्पादने, रुग्णालये, बहु पडदा सिनेमागृहे (मल्टीप्लेक्स), संरक्षण उत्पादन, औद्योगिक उत्पादने, औद्योगिक वापराचे जिन्नस वैगरे उद्योग केवळ मिडकॅप मध्येच उपलब्ध आहेत. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाला सुरवात होऊन दहा वर्षे झाली असून ऑगस्ट अखेरीस या फंडाची एकूण मालमत्ता १५९६४ कोटी होती. फंडाच्या ‘रेग्युलर प्लान’चा व्यवस्थापन खर्च १.६५ टक्के आहे. योजनेचा मानदंड ‘निफ्टी मिडकॅप १५० टीआरआय’ आहे. निकेत शहा आणि राकेश शेट्टी या योजनेचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत.
भारतीय शेअर बाजारातील मिड कॅप कंपन्यांनी मागील वर्ष भरात (ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४) दरम्यान जोरदार कामगिरी केली आहे. भारतातील मिड-कॅप कंपन्यांचे बाजार भांडवल साधारणपणे ५ ते २० हजार कोटी दरम्यान असते. मागील वर्षभराचा विचार केल्यास सर्वाधिक परतावा स्मॉलकॅप फंडांनी दिला असून त्या खालोखाल मिड-कॅप निर्देशांकाची कामगिरी आहे आणि सर्वात कमी परतावा लार्ज-कॅप निर्देशंकांनी दिला आहे. मिडकॅप कंपन्यांची व्यवसाय वाढीची क्षमता आणि गुंतवणूकदारांना लार्ज-कॅप गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त परतावा मिळणे यासारख्या घटकांनी प्रभावित होऊन अनेक गुंतवणूकदार स्मॉल कॅप, मिडकॅप आणि लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडात गुंतवणूक करीत आहेत. कोरोना पश्चात भारताच्या मजबूत आर्थिक वृद्धीदरामुळे मिड-कॅप कंपन्यांना लक्षणीय फायदा झाला आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वाढलेली सरकारी गुंतवणूक, विविध उत्पादने आणि सेवांची वाढती मागणी, कोरोन पश्चात बदललेल्या ग्राहकांच्या गरजा, आणि ग्राहकांच्या चैनीसाठी उपलब्ध (डिस्पोजेबल) उत्पन्नात झालेली वाढ यासारख्या अनेक कारणांमुळे मिडकॅप कंपन्यांच्या वृद्धीदरात वाढ झाली आहे नव गुंतवणूकदारांची वाढ आणि नियोजनबद्ध गुंतवणूक योजनांचा (एसआयपी) व्यापक अवलंब हे मिड-कॅप कंपन्यांच्या तेजीमागील प्रमुख कारणे आहे. हे घटक काही मिड-कॅप म्युच्युअल फंडांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी कारण ठरले आहेत, विशेषत: गेल्या पाच वर्षांमध्ये, असंख्य गुंतवणूकदारांना तुलनेने कमी कालावधीत मोठ्या संपत्तीची निर्मिती करण्यास सक्षम केले असल्याचे दिसत आहे.
भारतातील सध्याच्या समष्टी अर्थशास्त्रीय परिमाणे मिड-कॅप कंपन्यांत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तवीत आहेत. मिडकॅप फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. लार्ज-कॅप्सच्या तुलनेत मिड-कॅप कंपन्या साधारणपणे व्यवसायात नवीन असल्याने ‘प्रोडक्ट लाईफ सायकलच्या’ उच्च-वाढीच्या टप्प्यात असतात. या उच्च वृद्धीमुळे गुंतवणूकदारांना कंपन्यांच्या समभागांच्या किमतींमध्ये वेगाने वाढ झाल्याचा फायदा होतो. मिड-कॅप फंडातील गुंतवणूक विविध उद्योगक्षेत्रात असल्याने मिड-कॅप फंडात तुमची गुंतवणूक वैविध्य देते. यामुळे जोखीम कमी होते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, मिड-कॅप कंपन्या या लार्ज-कॅप कंपन्यांच्या तुलनेत अधिक अस्थिर असतात. मिड-कॅप कंपन्यांच्या समभागांच्या किंमतीत वेगाने चढ उतार होतात. गुंतवणूकदारांनी आपली मानसिकता संभाव्य अस्थिरतेसाठी तयार करणे गरजेचे आहे. मिडकॅप कंपन्यांचे सध्याचे मुल्यांकन पाहता, पाच ते दहा वर्षांच्या गुंतवणुकीच्या उद्देशाने गुंतवणूकदारांनी मिड-कॅप फंडांचा विचार केला पाहिजे. तथापि, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याही मिड-कॅप फंडात आंधळेपणाने गुंतवणूक करावी. उत्कृष्ट कामगिरीचा इतिहास आणि प्रतिष्ठित निधी व्यवस्थापक असलेल्या या फंडाची निवड केल्यास वेगाने संपत्ती निर्मितीला हातभार लाभेल. मिड-कॅप फंडात गुंतवणूक करीत असतांना संबंधित जोखमींबद्दल जागरूक असले पाहिजे. गुंतवणूक करण्यापूर्वी मिडकॅप फंड तुमच्या जोखीम सहिष्णुता आणि आर्थिक उद्दिष्टांशी जुळत असल्याची खात्री केल्या नंतर गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा.